पेशव्यांच्या नाविक साम्राज्याचे भक्कम प्रतीक | अर्नाळा किल्ला | Forts of India

जंजिरे अर्नाळा : उत्तर कोकणातील बेलाग जलदुर्गांच्या बळकट फळीत जंजिरे अर्नाळा किल्ल्याचे विलक्षण महत्व आहे. १६ व्या शतकात पोर्तुगिजांनी तयार केलेल्या नकाशावर अर्नाळा बेटावर फक्त एकच टेहळणी बुरुज उभारलेला स्पष्ट दिसतो. नरवीर चिमणाजी आप्पा पंडित यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकणातील रणसंग्रामात मराठी सैन्याने पहिले श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली जंजिरे अर्नाळा हा पूर्णपणे नवीन स्वतंत्र जलदुर्ग बांधला. याचा स्पष्ट सविस्तर देवनागरी तपशील व तारीख अर्नाळा किल्ल्याच्या दिल्ली दरवाजा नामक बुलंद प्रवेशद्वाराच्या मध्यभागी लिहिलेला आहे. अर्नाळा बेटाच्या एका टोकावर किल्ल्यापासून काही अंतर लांब पोर्तुगीज राजवटीत बांधलेला एकमेव टेहळणी बुरुज पोर्तुगीज कालखंडात मॉर्टेलो टॉवर म्हणून ओळखला जाई. वसईच्या रणसंग्रामात मराठ्यांनी या जीर्ण झालेल्या जुन्या टेहळणी बुरुजाचे पूर्णपणे नवीन दुरुस्ती बांधकाम करून त्यास हनुमंत बुरुज असे नाव दिले. सन १७३७ साली मराठयांनी उत्तर कोकणात बांधलेला हा बुलंद जंजिरे अर्नाळा महाराष्ट्र प्रांतात सुभा अर्नाळा आरमार नावाने प्रसिद्ध राहिला. यंदा सन २०२३ साली एप्रिल महिन्यात जंजिरे अर्नाळा २८६ वर्षांचा तरुण इतिहास मानकरी झाला. किल्ले वसई मोहिम परिवार संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी एप्रिल महिन्यात जंजिरे अर्नाळा स्मरण दिन मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. मराठ्यांच्या स्वतंत्र आरमार वाटचालीत जे प्रमुख नाविक दल संपूर्ण भारतात अग्रगण्य होते, त्यात अर्नाळा किल्ला गणला जात असे. आज आपण जो भव्य अर्नाळा किल्ला पाहतोय, ते पौराणिक वैतरणा मुखावर मराठ्यांनी उभारलेले एक भक्कम नाविक साम्राज्य आहे.